त्या ८०” विद्यार्थ्यांना अखेर शाळा सोडल्याचे दाखले वितरित; एकता संघटनेचा संघर्ष यशस्वी

“त्या ८०” विद्यार्थ्यांना अखेर शाळा सोडल्याचे दाखले वितरित; एकता संघटनेचा संघर्ष यशस्वी
नशिराबाद – अनेक तांत्रिक अडचणी आणि संघर्षानंतर अखेर केएसटी उर्दू शाळेतील दहावी उत्तीर्ण ८० विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले (एलसी) प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. २८ जून रोजी दुपारी ४ वाजता गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांच्या स्वाक्षरीने पालकांच्या उपस्थितीत दाखले वाटप करण्यात आले.
या वेळी एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख, नदीम मलिक, मतीन पटेल, हाफिज रहीम पटेल, अनिस शहा, फजल कासार, वासिफ सर, रईस शेख, रियाज मणियार, इस्माईल शेख, शरीफ शेख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण भावुक
दाखले वाटपावेळी मार्गदर्शन करताना उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण हे भावनिक झाले. “ज्या शाळेत २५ वर्षे सेवा दिली, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कुलूप तोडून तपासणी करावी लागली, ही वेळ कोणावर येऊ नये,” असे म्हणत त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांचे कौतुकाचे शब्द
कार्यक्रमादरम्यान गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी नशिराबाद ग्रामस्थांचे विशेष आभार मानले. “गावाशी थेट संबंध नसतानाही स्थानिकांनी संयम ठेवून सहकार्य केले, त्यामुळे हा गंभीर प्रश्न मार्गी लावता आला,” असे त्या म्हणाल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे एकता संघटनेतर्फे आभार
२५ ते २७ जून दरम्यान एकता संघटनेचे फारुक शेख आणि सहकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. हा विषय त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर असतानाही त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्या या भूमिकेचा गौरव करत एकता संघटनेने त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांचे जाहीर आभार मानले.
नशिराबादमध्ये जल्लोषात स्वागत
एलसी वाटपाची अधिकृत माहिती मिळाल्यावर एकता संघटनेचे प्रतिनिधी शाळेत दाखल होताच पालक आणि विद्यार्थ्यांनी फुलांच्या गुच्छांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर फारुक शेख यांनी पालकांशी संवाद साधत दाखले वाटप केले.
मार्गदर्शनाचे योगदान
दाखले वितरणाच्या वेळी मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी खलील शेख यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी संपूर्ण प्रक्रियेत सकारात्मक भूमिका घेतली.