
अपहरण करीत व्हिडिओ पाठवून मागितली 45 लाखांची खंडणी
दोन आरोपी गजाआड
चाळीसगाव :- एका 42 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याची सुटका करण्याकरिता 45 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील वाघले गावातील ४२ वर्षीय गणेश ताराचंद राठोड यांचे ३० मे २०२५ रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी ४५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता,
पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आणि गणेश राठोड यांची सुखरूप सुटका केली.अपहरणकर्त्यांनी गणेश राठोड यांना मारहाण करून त्यांचे व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल त्यांच्या मुलाला पाठवले आणि खंडणीची मागणी केली.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरुवात केली.तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपी, जयेश दत्तात्रय शिंदे (वय २८, रा. चाळीसगाव) आणि श्रावण पुंडलिक भागोरे (रा. नांदगाव) यांची ओळख पटवली.
नांदगाव परिसरात आरोपी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानुसार आरोपी हे मनमाड रेल्वे स्टेशनकडे दुचाकीवरून जाताना आरोपी पोलिसांना दिसले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता, आरोपींनी दुचाकी सोडून शेतात पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ५ किलोमीटरच्या पाठलागानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की, त्यांनी त्यांचे मित्र जनार्दन बाळू आवारे उर्फ राजू पाटील (रा. चाळीसगाव, सध्या डोंबिवली) आणि सोनू (पूर्ण नाव माहित नाही, रा. मुंबई) यांच्या सांगण्यावरून हे अपहरण केले. गणेश राठोड यांना मारहाण करून त्यांचे व्हिडिओ पाठवून ४५ लाखांची खंडणी मागितली होती.
आरोपींनी गणेश यांना चाळीसगाव तालुक्यातील पाटणा परिसरातील एका शेडमध्ये बांधून ठेवले होते.आरोपींनी गणेश राठोड यांना विंचूर-लासलगाव जंगलात सोडले होते, तर उर्वरित दोन आरोपी फरार झाले. पोलिसांनी जंगलात शोध घेऊन जखमी अवस्थेत गणेश राठोड यांना ताब्यात घेतले आणि त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. पकडलेल्या आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमोळे, पोलीस हवालदार संदीप पाटील, मुरलीधर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील, सागर पाटील, भुषण शेलार, ईश्वर पाटील, भुषण पाटील, जितेंद्र पाटील आणि चापोलीस दिपक चौधरी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.