
बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम ; ३९ मचाणांद्वारे होणार प्राणीगणना
जळगाव मीडिया न्यूज डेस्क l यावल वनविभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमांतर्गत प्राणीगणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक, चोपडा श्री. प्रथमेश हाडपे यांच्या संकल्पनेतून यावल वनविभागातील चोपडा ते रावेर वनक्षेत्रातील जंगल भागात एकूण ३९ मचाणांची उभारणी करण्यात आली आहे.
प्रत्येक मचानावर एकावेळी ३ ते ४ व्यक्ती बसू शकतात. यामध्ये चोपडा वनक्षेत्रात ३, वैजापूर – ७, अडावद – ५, देवझिरी – ५, यावल पूर्व – ६, यावल पश्चिम – ५ तर रावेर वनक्षेत्रात ८ मचाणांचा समावेश आहे. प्राणीगणना ही प्रत्यक्षदर्शी निरीक्षण तसेच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे केली जाणार असून निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी हा एक दुर्मीळ अनुभव ठरणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत निसर्गप्रेमींना रात्रीच्या वेळेस जंगलातील थरारक वातावरणात विविध वन्यजीवांचे दर्शन घेता येणार आहे. विशेषतः बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा, चितळ, भेकर, चौशिंगा, साळिंदर, नीलगाय, रानडुक्कर, मोर तसेच विविध पक्ष्यांचे निरीक्षण करता येणार आहे.
या उपक्रमासाठी यावल वनविभागामार्फत प्रती व्यक्ती शुल्क रुपये ५००/- आकारण्यात येणार असून त्यामध्ये भोजन व अन्य सुविधा समाविष्ट असतील. सहभागासाठी नोंदणीसाठी QR कोड उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यावल वनविभागातील नैसर्गिक पाणवठ्यांची स्वच्छता, दुरुस्ती, नवी पाण्याची व्यवस्था आणि मचाण उभारणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन म. वनसंरक्षक (प्रा.) धुळे वनवृत्त श्रीमती निनू सोमराज, म. उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) श्री. प्रथमेश हाडपे आणि सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) श्री. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यावल वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.