
शहर पोलिसांची धडक कारवाई : भाईगिरी करणाऱ्यांची दहशत संपवली
जळगाव ;- घातपाताच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीचा डाव शहर पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन गावठी पिस्तुलं, दहा जीवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर शहरातील भाईगिरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांच्या धाडसी कारवाईचे कौतुक केले आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी मध्यरात्री गस्त घालत असताना गेंदालाल मिल परिसरातील माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या घराजवळ काही संशयित इसम आढळले. पोलिसांनी विचारपूस केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांच्यावर संशय बळावला. अंगझडतीदरम्यान एका इसमाच्या कमरेला लोड केलेला गावठी कट्टा सापडला. त्यानंतर त्यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यामध्येही एक कट्टा आणि जीवंत काडतुसे आढळली.
त्यानंतर पोलिसांनी युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (३३, रा. गेंदालाल मिल), सौहील शेख उर्फ दया सीआयडी (२९, रा. शाहूनगर), निजामोद्दीन शेख हुसेनोद्दीन शेख (३१, रा. आझादनगर) आणि शोएब अब्दुल सईद शेख (२९, रा. गेंदालाल मिल) या चौघांना ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने या आरोपींची गेंदालाल मिल परिसरातून पायी धींड काढली. ज्या भागात ही टोळी दहशत माजवत होती, त्याच भागातून पोलिसांनी त्यांची धिंड काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कारवाईमुळे शहरातील गुंडगिरीला मोठा आळा बसला असून, भाईगिरी करणाऱ्यांच्या थरकाप उडाला आहे.