
पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी – डॉ. राधेश्याम चौधरी
अंजाळे सर्कलमधील १५ गावांच्या केळी पीक विमा भरपाईतील अन्यायावर कारवाईची मागणी
जळगाव प्रतिनिधी I यावल तालुक्यातील अंजाळे सर्कलअंतर्गत बामणोद परिसरातील १५ गावांतील शेतकऱ्यांना केळी पीक विमा नुकसान भरपाईत विमा कंपनीकडून अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा आरोप करत भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मंगळवारी (दि. ४ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय्य भरपाई मिळावी अशी मागणी केली.
मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार आणि आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार ही भेट घेण्यात आली. या दरम्यान डॉ. चौधरी यांनी सांगितले की, बामणोद परिसरातील अंदाजे ९७५ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाला अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ७४,५०० रुपयांऐवजी फक्त ४२,५०० रुपयांची भरपाई मिळणार असल्याचे समोर आले आहे.
अंजाळे सर्कलमध्ये हवामान नोंदविण्यासाठी कोणतीही उपकरणे नसल्याने भुसावळ तालुक्यातील साकेगाव सर्कलच्या हवामान केंद्राचा अहवाल येथे लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अचूक आकडेवारी न मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या प्रकरणी तत्काळ दखल घेत जिल्हा कृषी अधिकारी व राज्यस्तरीय विमा अधिकाऱ्यांना संपर्क साधून प्रत्येक सर्कलमध्ये हवामान नोंदणी यंत्रे बसविण्याच्या सूचना दिल्या. पुढील काळात अशा चुका होऊ नयेत, यासाठी देखरेख यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या वेळी सुजित चौधरी, जितेंद्र चौधरी, निलेश चौधरी, दीपक चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, गिरधर चौधरी, जगदीश पाटील, विकास पाटील, कल्पेश पाटील, धनराज कोळी, लिलाधर चौधरी, प्रशांत पाटील, दीपक पाटील यांसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




