
ब्रेकिंग : राज्यात पोलिस दलात मोठी खांदेपालट; 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
कोल्हापूर, रायगड, धाराशिवसह प्रमुख जिल्ह्यांना नवे नेतृत्व; कायदा-सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचे टप्पे
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आली असून, राज्य सरकारने 22 पोलिस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. काही जिल्ह्यांतील अचानक झालेल्या नियुक्त्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोल्हापूर, सातारा आणि रायगड जिल्ह्यांत नव्या अधिकाऱ्यांची वर्णी
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली ठाणे शहर पोलिस उपायुक्तपदी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची नियुक्ती बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी झाली आहे. रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती नव्याने स्थापन झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे शहर पोलिस गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची रायगड पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली आहे.
धाराशिवच्या पोलिस दलाची जबाबदारी रितू खोकर यांच्यावर
धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकपदी सांगली येथील अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांची नेमणूक झाली आहे. सध्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची बदली करण्यात आली असून, त्यांना नवीन पद अद्याप देण्यात आलेले नाही. गृह विभागाकडून त्यांना स्वतंत्रपणे नियुक्ती दिली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत. रितू खोकर यांच्यासमोर तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणासह जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
नव्या नेतृत्वाकडून कार्यक्षमतेची अपेक्षा
राज्य सरकारच्या या व्यापक बदल्यांमुळे विविध जिल्ह्यांना नवे पोलिस नेतृत्व लाभणार असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही पावले निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून कार्यक्षम आणि परिणामकारक प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.