
“राष्ट्र प्रथम” रक्तदान अभियानाची भुसावळमधून दणक्यात सुरुवात; जिल्हाधिकाऱ्यांचा रक्तदानातून देशसेवेचा संदेश
भुसावळ (प्रतिनिधी) – “रक्तदान हे राष्ट्रसेवेचं सर्वोच्च कर्तव्य” या भावनेने प्रेरित होऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळच्या विभागीय रेल्वे रुग्णालयात स्वतः रक्तदान करत नागरिकांना प्रेरणा दिली. यासोबतच “राष्ट्र प्रथम – रक्तदान अभियान” या १५ दिवसीय विशेष मोहिमेचा शानदार शुभारंभ झाला.राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
१५ दिवस, शेकडो शिबिरे, हजारो जीव वाचवण्याचा संकल्प
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानांतर्गत पुढील १५ दिवसांत जिल्ह्यातील सर्व तालुके, गावे आणि शहरी भागांत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन होणार आहे. या शिबिरांमधून संकलित रक्तापैकी ५०% रक्त भारतीय सैन्यासाठी, तर उर्वरित रक्त गरजूंना उपलब्ध करून दिले जाणार आहे
.रक्तदान : देशसेवेचा सर्वात प्रभावी मार्ग
“सीमेवर जवान शौर्याने लढत आहेत, तर शेतकरी दुष्काळाशी झुंज देत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा रक्तदान हा सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वोत्तम मार्ग आहे,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच जिल्ह्यात रक्तदान शिबिरांसाठी आवाहन केले होते. भुसावळमधून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद “राष्ट्र प्रथम” अभियानाला अधिक बळकटी देणारा ठरला आहे.