
वादळी वारे, विजा व पावसाचा इशारा; जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी
जळगाव l प्रतिनिधी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सुचनेनुसार जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दिनांक ६ मे २०२५ रोजी दुपारी ४.४० वाजता प्राप्त सूचनेनुसार, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच नागरिकांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
करावयाच्या उपाययोजना :
1. विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळावे. सुरक्षित इमारत उपलब्ध नसेल, तर सखल जागा निवडून गुडघ्यात डोके घालून बसावे.
2. विजा चमकत असताना घरात अथवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. बाल्कनी, छत किंवा ओट्यावर थांबू नये.
3. घरात असताना विद्युत उपकरणे वापरत असल्यास ती त्वरित बंद करावीत.
4. विजेचे खांब, तारांचे कुंपण आणि लोखंडी वस्तूं पासून दूर रहावे.
5. पाण्यात उभे असल्यास त्वरित पाण्यातून बाहेर पडावे.
*करू नयेत अशा गोष्टी :
1. विजा चमकत असताना लँडलाईन फोन, शॉवर, नळ, पाईपलाईन किंवा अन्य विद्युत उपकरणांचा वापर करू नये.
2. धातूच्या तंबू किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये.
3. उंच झाडाखाली थांबू नये.
4. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबणे टाळावे.
5. उघड्या दारातून अथवा खिडकीतून विजा पाहणे टाळावे.
जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकृत सूत्रांकडूनच माहिती घेऊन गरज असल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
—