गुन्हेजळगाव

जळगावात खुनाचा बदला घेण्यासाठी मध्यरात्री थरार !

दोन घरांची कुलपे तोडून पेटवून देण्याचा प्रयत्न; शनीपेठ पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

जळगावात खुनाचा बदला घेण्यासाठी मध्यरात्री थरार !

दोन घरांची कुलपे तोडून पेटवून देण्याचा प्रयत्न; शनीपेठ पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील गुन्हेगारी जगतातील जुन्या वैमनस्यातून खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने एका ५५ वर्षीय महिलेच्या दोन वेगवेगळ्या घरांवर मध्यरात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संशयित आरोपींनी आधी महिलेला धमकी दिली आणि त्यानंतर मध्यरात्री दोन वेगवेगळ्या भागात असलेल्या त्यांच्या घरांची कुलपे तोडून घरात जाळपोळ आणि तोडफोड करत नुकसान केले. या धक्कादायकप्रकरणी जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, लताबाई तुकाराम सूर्यवंशी (वय ५५ वर्षे, व्यवसाय-गृहिणी, रा. आसोदा रोड, घरकुल, जळगाव) असे या घटनेतील पीडित फिर्यादी महिलेचे नाव आहे. लताबाई यांचा मुलगा शाम सूर्यवंशी याने काही काळापूर्वी नितीन काळे नावाच्या तरुणाचा खून केला होता. याच खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने नितीनचा नातेवाईक संशयित आरोपी क्रमांक १ राजू नाना काळे (वय २९ वर्षे) याने रविवार, २४ मे २०२६ रोजी सकाळी ८:४५ वाजता घरकुल क्रमांक २५, आसोदा रोड येथे लताबाई यांना गाठले. “तुझ्या मुलाने आमच्या नितीनचा खून केला आहे, त्याचा बदला म्हणून आज मी तुला पाहून घेतो, आज तुझे घर पेटवून देतो!” अशी जाहीर आणि उघड धमकी राजू काळे याने लताबाई यांना दिली होती.

या धमकीनंतर संशयित आरोपी राजू नाना काळे याने त्याचा साथीदार सतीश ज्ञानेश्वर कोळी (वय २३ वर्षे, दोघे रा. घरकुल चौक, जळगाव) याला सोबत घेऊन सोमवार, २५ मे २०२६ च्या मध्यरात्री अत्यंत पद्धतशीरपणे घातपात घडवण्याचा कट रचला. मध्यरात्री १:३० ते २:०० वाजेच्या सुमारास या दोन्ही आरोपींनी पहिल्यांदा लताबाई यांच्या दिनकर नगर भागातील ‘आई-वडिलांची पुण्यघाई’ (सर्व्हे नं. १३२) या बंद घराचे कुलूप तोडले. त्यांनी घरात प्रवेश करून साहित्याची प्रचंड तोडफोड केली आणि घरात आग लावून देऊन मोठे नुकसान केले.

एवढ्यावरच या आरोपींचे समाधान झाले नाही. यानंतर रात्री २:०० वाजेच्या सुमारास या दोन्ही नराधमांनी थेट लताबाई यांच्या आसोदा रोडवरील दुसऱ्या मुख्य घराकडे धाव घेतली. तिथेही त्यांनी घराचे कुलूप तोडून घर पेटवून देण्याचा आणि जाळून खाक करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री घडलेल्या या जाळपोळीच्या आणि तोडफोडीच्या सत्रामुळे परिसरात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

या भयानक प्रकारानंतर पीडित महिलेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. लताबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार, २५ मे २०२६ रोजी सकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात राजू नाना काळे आणि सतीश ज्ञानेश्वर कोळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) साजिद मन्सूरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) रवींद्र गायकवाड करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button