जळगावमध्ये हापूस आंब्यांना मागणी ; ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावमध्ये हापूस आंब्यांना मागणी ; ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पेटी २ हजार ते ६ हजारांपर्यंत; नैसर्गिक पद्धतीच्या आंब्यांना मागणी
जळगाव प्रतिनिधी रत्नागिरी व देवगड परिसरातील नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले उच्च प्रतीचे हापूस आंबे आता जळगाव शहरात गोलाणी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. रासायनिक प्रक्रियेशिवाय पिकवलेल्या या आंब्यांना चव, सुगंध आणि टिकाऊपणामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरवर्षी जिल्ह्यात कोकणातून येणार्या हापूस आंब्याला चांगली मागणी असते. आंब्यांच्या आकारानुसार प्रती डझन ४०० ते १५०० रुपये दर असून, पेटीचा दर २ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत आहे. बाजारभावाच्या तुलनेत हे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात असल्याने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
रत्नागिरी व देवगडमधील आंबा उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध होत आहे. ग्राहकांनाही दर्जेदार आणि नैसर्गिक हापूस आंबे परवडणाऱ्या किमतीत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून हापूस आंब्यांना चांगलीच मागणी वाढली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सध्या ग्राहकांकडून हापूस आंब्यांना चांगली मागणी असून बाजारातील वातावरण उत्साहपूर्ण आहे. पुढील महिनाभर दर स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




