
बारावीचा निकाल जाहीर : जळगाव जिल्ह्याची ९४.५४ टक्के उत्तीर्णता
पालकमंत्र्यांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन,
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल सोमवारी, ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
या परीक्षेत जळगाव जिल्ह्याने ९४.५४ टक्के उत्तीर्णतेसह उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जिल्ह्यातून एकूण ४४,७३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४२,२९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
नाशिक विभागाचा एकूण निकाल ९१.३१ टक्के लागला असून नाशिक जिल्हा ९५.६१ टक्क्यांसह अव्वल राहिला. त्याखालोखाल जळगावचा क्रमांक लागतो.
धुळे जिल्ह्याचा निकाल ७४.८८ टक्के, तर नंदुरबारचा निकाल ८६.६२ टक्के इतका लागला आहे.
पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा व मार्गदर्शन
निकाल जाहीर झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
“ज्यांना यश मिळाले आहे त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा. पण अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता आत्मपरीक्षण करावे, सातत्य व संयमाने पुन्हा प्रयत्न करावेत, यश नक्की मिळेल,” असा सकारात्मक सल्ला त्यांनी दिला.
गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्जाची अंतिम तारीख – २० मे
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती किंवा पुनर्मूल्यांकनासाठी ६ मे ते २० मे २०२५ या कालावधीत http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत लागणारे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.