
विनापरवानगी उभारलेल्या गतिरोधकावर दुचाकी घसरली; आईच्या कुशीतून पडून चिमुकलीचा मृत्यू
जळगाव मीडिया न्यूज डेस्क l आमोदा-घार्डी रस्त्यावर विनापरवानगी आणि चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेल्या गतिरोधकामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आईच्या कुशीतून पडलेल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, अपघातस्थळी उभारलेल्या गतिरोधकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देवगाव (ता. जळगाव) येथील संदीप सोनवणे हे पत्नी ज्योती यांना कोळन्हावी येथून घेवून दुचाकीवरून परत येत असताना आमोदा-घार्डी रस्त्यावरील विनापरवानगी आणि नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गतिरोधकावर त्यांच्या दुचाकीचा तोल गेला. यामुळे त्यांच्या हातात असलेली पाच महिन्यांची कन्या गायत्री ही रस्त्यावर पडून तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
अशाच प्रकारे दुसऱ्या दिवशीही अपघात
या दुर्घटनेनंतर अवघ्या २४ तासांत शुक्रवारी दुपारी याच ठिकाणी दुसरा अपघात घडला. निताबाई राजेंद्र पाटील (वय ४१, रा. सावखेडा खु.) या दुचाकीवरून जात असताना गतिरोधकावरून गाडी उडाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुरक्षेचा प्रश्न, नागरिक संतप्त
या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे अनेकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित रस्त्यावर अनेक ठिकाणी विनापरवानगी, अनियमित व धोकादायक गतिरोधक उभारले गेले असून, प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी व जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी मृत बालिकेच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.