4 व 5 जुलैला मुसळधार पावसाचा इशारा; धोकादायक पर्यटन स्थळांपासून दूर राहा – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

जळगाव मीडिया प्रतिनिधी: मुंबई, दि. 2 जुलै: राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे घाटमाथा परिसरात 4 आणि 5 जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
गिरीश महाजन यांनी नागरिकांना विशेषतः धबधबे, घाटमाथा, दऱ्या, नद्या, ओढे तसेच इतर धोकादायक पर्यटन स्थळांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती, दरड कोसळणे आणि पाण्याचा वेग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणताही अनावश्यक धोका पत्करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी हवामान विभाग व प्रशासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचना आणि इशाऱ्यांचे पालन करावे, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, पावसाळी पर्यटनाचे नियोजन करताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.




